पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ पदावरून दूर करावं, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने ही मागणी केली आहे.
राज्यातील राजकीय हिंसाचाराला उत आला असून रश्मी शुक्ला या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या विरोधी पक्षाच्या विरोधात आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्रदेखील पाठवलं आहे.
त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचं तसेच त्यांना नाहक त्रास देण्याचा आदेश पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना दिला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही, असंही काँग्रेसनं या पत्रात म्हटलं आहे.
याआधी काँग्रेसकडून 24 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी याचप्रकारची मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा याच मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
एकीकडे आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेचच झारखंडच्या महासंचालकांना हटवण्यात आलं; मात्र, महाराष्ट्रात ही कारवाई अद्यापही झालेली नाही, असा प्रश्नही काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
काँग्रेसने ही मागणी असतानाच, दुसरीकडे गृह विभागाने 31 ऑक्टोबर रोजी 28 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे.
कोण आहेत रश्मी शुक्ला?
याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या.
रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. 1988 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी (DG) प्रमोशन दिलं. त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली.